सोमवार, १८ ऑगस्ट, २०२५

आरण्यक - परिचय आपल्या संस्कृतीचा | Our Sanskriti - Aranyaka


 वैदिक काळात देवता महत्वाच्या होत्या पण ब्राह्मणकाळात (ब्राह्मणग्रंथ काळात) यज्ञ विधींना सर्वात जास्त महत्त्व प्राप्त झाले होते. जर यज्ञविधी अचूकपणे केले तर देवतांना तुमच्या कार्यात सहाय्य करावेच लागते हा समज ब्राह्मण काळात प्रचलित होता. यज्ञांचे माहात्म्य एवढे वाढले की १/१ वर्ष चालणारी यज्ञसत्र अस्तित्वात आली. वेद संहितेत यज्ञ हे साधन होतं तर ब्राह्मणकाळात यज्ञ साध्य बनलं.


पण कालांतराने लोकांना यज्ञासाठी शक्ती, धन, वेळ देणं परवडेनास झालं. यज्ञ फक्त स्वर्गसुख देतं तेही पुण्य असेपर्यंतच, कायम नाही हा विचारही हळुहळु मनात रुजू लागला. म्हणून मग कायम सुखाचा शोध सुरु झाला. हे विचारमंथन हाच आरण्यकांचा काळ मानला जातो.

अरण्यातच ज्या ब्राह्मणभागाचं व्रतस्थ राहून पठण करायचं तो भाग म्हणजेच ‘आरण्यक’ . सर्व आरण्यकं ही ब्राह्मणग्रंथांची अखेरची प्रकरणं आहेत. यात यज्ञधर्माच्या विधानात्मक विवेचनापेक्षा यज्ञांचं तात्त्विक विवेचन आढळतं. खरे पाहता मुळात उपनिषदे म्हणजे आरण्यकेच आहेत. अनेक प्राचीन उपनिषदे वर्तमान आरण्यकांचे भाग आहेत.

सायणाचार्यांनी आरण्यकाची केलेली वाख्या –
आरण्याध्ययनात् एतद् आरण्यकम् इतीर्यते
अरण्ये तदधीयीते त्येवं वाक्यं प्रवक्ष्यते |

अरण्यात जाऊन ज्याचा अभ्यास करायचा आणि जे अरण्यातच रचले गेले आहे ते आरण्यक.

काहींच्या मते प्रत्येक शाखेचं एक याप्रमाणे ११८० आरण्यकं एकेकाळी अस्तित्वात होती. तर काहींच्या मते एकूण १३०० आरण्यके होती. पण आज मात्र फक्त ८ उपलब्ध आहेत. १) ऐतेरेय २) शांखायन ३) तैत्तिरीय ४) बृहदारण्यक ५) मांध्यदिन बृहदारण्यक ६) कण्व बृहदारण्यक ७) जैमिनीयोपनिषदारण्यक ८) छांदोपग्यारण्यक.

ऐतेरेय आरण्यकात एकूण ५ अध्याय आहेत. ह्याची प्रमुख देवता अग्नि आहे आणि ह्यात अन्नाचे महत्व सांगितले आहे. गायत्री, उष्णीक् आणि बृहती या छंदात २४० ऋचा फक्त अन्नाविषयीच आहेत.

जीवात्म्यासाठी भूती हा शब्द सर्व प्रथम ऐतेरेय आरण्यकात आलेला आहे असे मानले जाते. प्राण असलेला तो भूती आणि प्राण नसलेला म्हणून अभूती.

जगताचा निर्माता म्हणजे पुरुष आणि त्या पुरुषाला अन्नमय आणि हिरण्यगर्भ म्हटले आहे.

ह्यात पुरुषाचे ३ जन्म सांगितले आहेत. १) तो स्वतः जन्मतो तो २) पुत्र जन्म ३) जेव्हा पुत्राचे वैदिक आणि लौकिक कर्मसंस्कार करतो तेव्हा.

आरण्यकांमध्ये जन्म मृत्यू विषयी जाणून घ्यायची जिज्ञासा आढळते. ब्राह्मण ग्रंथातील कर्मकांडांचा आणि उपनिषदातील तत्वांचा इथे योग्य समतोल साधलेला दिसतो.

आरण्यकांमधून देवाबद्दल व एकूणच तत्त्वज्ञानाबद्दल विवेचन आहे. देवाची भक्ती कशी करावी, तसंच मन, काया, आत्मा, परलोकीचे जीवन, पुनर्जन्म इत्यादींचा वेध त्यातून घेतलेला आहे. उपनिषदांसह आरण्यकं म्हणजे ‘वेदान्त’ म्हणजेच वेदांचा अखेरचा भाग.

© नयना पिकळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, चतुर्थ अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 4 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ चतुर्थ: अंशः ॥ त्रयोदशो ऽध्यायः ॥   "सत्वतच्या सन्ततिचे वर्णन आणि स्यमन्तक मण्याची कथा" श्रीप...